नंदुरबार रायगड

आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी–आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी
–आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

रायगड-अलिबाग,दि.7(जिमाका): “आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आणि त्यांचा देदीप्यमान इतिहास हा त्या समाजाचा खरा आत्मा आहे. जल, जमीन आणि जंगल यांचे रक्षण करणाऱ्या या समाजाच्या परंपरांचे जतन करणे ही केवळ शासनाचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी आज पेण येथे केले.


आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आदिवासी विकास परिषद’ सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. पेण येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याला आदिवासी बांधवांची मोठी उपस्थिती लाभली होती.


मंत्री डॉ. वुईके पुढे म्हणाले की, “आदिवासी समाज अत्यंत नम्र, प्रामाणिक आणि विश्वासू आहे. त्यांच्या भावना आणि गरजा समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट वाड्या-वस्त्यांवर जाऊन अभ्यास करणे आवश्यक आहे. आदिवासी विकास विभाग हा या समाजाच्या उन्नतीसाठीच निर्माण झाला असून, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
आदिवासी महिलांचा आत्मविश्वास वाढवणे हेच ध्येय
– कु.अदिती तटकरे


महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना रायगड जिल्ह्यातील आदिवासी, ठाकर आणि कातकरी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “आदिवासी वाड्यांमधील मुले अत्यंत जिद्दी आणि कणखर असतात. ‘अमृता आहार’ योजनेच्या माध्यमातून आपण कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहोत. सुधागड-पाली तालुक्यात आदिवासी विभागाचे स्वतंत्र संकुल उभारण्यासाठी शासन सकारात्मक विचार करत आहे.”
आदिवासी विकासासाठी २१ हजार कोटींची तरतूद
– भरत गोगावले


रोहयो मंत्री श्री.भरत गोगावले यांनी शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची माहिती दिली. ते म्हणाले की, “आदिवासी विभागासाठी २१ हजार कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. दुर्गम भागातील वाड्यांना रस्ते, पाणी आणि सभागृह यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.”


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी आदिवासी बांधवांनी लावलेल्या स्टॉल्सना भेट देऊन त्यांच्या हस्तकलेचे कौतुक केले. यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना विविध योजनांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
या परिषदेला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पेणच्या नगराध्यक्ष श्रीमती प्रीतम पाटील, पद्मश्री परशुराम गंगावणे, आदिवासी विकास विभाग चे अप्पर आयुक्त (ठाणे) गोपीचंद कदम आणि प्रकल्प अधिकारी श्रीमती तेजस्विनी गलांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अप्पर आयुक्त गोपीचंद कदम यांनी प्रास्ताविकात विभागाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *