
साक्री रोड? छे! यमसदनाकडे नेणारा रोड
साक्री रोडवर आणखी किती बळी हवेत?
ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांचा सवाल
धुळे शहरातील मोतीनाला ते कृष्णाई हॉटेलपर्यंत या साक्री रोडवर गेल्या काही वर्षात अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यात जायबंदी आणि मृत्युची संख्या अगणित आहे. काही वर्षापूर्वी सिंचन भवन जवळ झालेला शालेय विद्यार्थिनीचा मृत्यु, सुरेंद्र डेअरी समोरील एका युवकाचा मृत्यु, मोहन मेडीकल जवळ कुसुंबे येथील एका भगिनीचा मृत्यु आणि काल परवाच मोहन रेस्टॉरंट जवळ दुचाकीच्या धडकेने झालेला एका पादचाऱ्याचा मृत्यु. एव्हढे लगोपाठ बळी जात असतांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाला अजून किती बळी हवेत? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांनी केला आहे.
सुरेंद्र डेअरी, पू. झुलेलाल मंदीराजवळील कृष्णा डेअरी आणि कल्याणी डेअरीजवळ गतीरोधकांची अत्यंत गरज असतांना वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष केले जाते. जेथे गतिरोधक आहेत तेथे ‘झेब्रा पट्टे’ मारलेले नाहीत. विद्यावर्धिनीसमोरील गतिरोधकावर ‘झेब्रा पट्टे’च नसल्याने काही समाजसेवकांनी तेथे रेडीयमचे तुकडे चिकटवले आहेत; मग बांधकाम खात्याची नेमकी जबाबदारी काय? संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची या भागातच आप्तेष्ट व निवासस्थाने आहेत. त्यांची रोजच ये-जा असते. तरीही ते पाहुन न पाहिल्यासारखे करतात याची खात्री झाली आहे.
साक्री रोडवर विविध सोयी सुविधा असल्यामुळे ग्रामीण व देवपूर भागासह पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यात बेदरकारपणे वाहन चालवणारी युवा पिढी. त्यामुळे अपघात होणारच. बळी देऊनही ‘बळी हो बळी’ हे बळी रोखणार कोण? सार्वजनिक बांधकाम विभाग व परिसरातील नवनिर्वाचित महापालिकेचे कारभारी यांनी सुमध्य साधला पाहिजे. आता साक्री रोडचे समाज माध्यमावरील ‘मृगजळी’ कौतुक बंद झाले पाहिजे.
‘अरे, साक्री रोड तुनी काय वानू मी बढाई…
दर महिनाले लोके देस सर्गामा भिडाई’
- 0
- 0
- 0
- 0





