
जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविण्यास प्राधान्य – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
बेलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ६ कोटी १२ लाखांच्या कामांचा शुभारंभ

शिर्डी,दि.७ :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे ६ कोटी १२ लाख रुपये निधीतून साकारण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा शुभारंभ राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी पालकमंत्र्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्र्यांनी घरकुल योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवाद साधला. तसेच, विद्यार्थी कल्याण योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची विस्तृत माहिती देण्यात आली.

डॉ. विखे पाटील म्हणाले , प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत’ संकल्पनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ही एक मोठी संधी असून, स्थानिक पातळीवर या योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगताना त्यांनी जलसंपदा विभागाच्या वतीने नदीजोड प्रकल्पांची कामे गतीने सुरू असल्याची माहिती दिली. तसेच, कालवे, ओढे व नाले अतिक्रमणमुक्त करून त्यांच्या दुरुस्ती व सक्षमीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे स्पष्ट केले.
भविष्यातील नियोजनाबाबत बोलताना, जिल्ह्यात आगामी काळात औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार असून, त्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेलापूरविकास #श्रीरामपूर #राधाकृष्णविखेपाटील #अहिल्यानगर #विकासकामे #पाणीप्रश्न #नदीजोडप्रकल्प #विकसितभारत #घरकुलयोजना #ग्रामीणविकास #रोजगारनिर्मिती #जलसंपदामंत्री
- 0
- 0
- 0
- 0





