हिवाळ्याचा कडाका वाढत असताना शहरासह ग्रामीण भागात पायात अचानक नस आकडणे, पिंडरीत गोळे येणे, तसेच पायाची बोटं एकमेकांवर चढणे अशा तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः रात्री झोपेत किंवा सकाळी उठताना हा त्रास अधिक जाणवत असून, अनेक नागरिकांना तीव्र वेदनांमुळे झोपेतून जाग येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा त्रास केवळ थंडीमुळे होणारा तात्पुरता त्रास नसून तो शरीरातील खनिजे, पाणी किंवा नसांशी संबंधित आजाराचा इशारा असू शकतो. हिवाळ्यात तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. परिणामी पायांच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे स्नायू ताठर होऊन अचानक आकडी (क्रॅम्प) येते. यालाच सर्वसाधारण भाषेत ‘नस धरली’ किंवा ‘गोळा आला’ असे म्हटले जाते. काही रुग्णांमध्ये हा गोळा काही सेकंदांत कमी होतो, तर काहींमध्ये वेदना दीर्घकाळ टिकतात.

दिवसातून दोन वेळा पायांचे हलके स्ट्रेचिंग व्यायाम, पायांना कोमट पाण्याची शेक किंवा गरम पाण्यात पाय बुडवणे. दिवसाला किमान २ ते २.५ लिटर पाणी पिणे, आहारात केळी, नारळपाणी, दूध, दही, हिरव्या भाज्या, सुके मेवे यांचा समावेश, झोपण्यापूर्वी गरम तेलाने मालिश, थंडीत पाय उबदार ठेवणारे मोजे व योग्य पादत्राणांचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात आराम मिळू शकतो. रात्री पाय शेकणे सुद्धा उपयोगी होऊ शकते.
- 0
- 0
- 0
- 0





