नंदुरबार

आमलाड येथे विश्व आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा­

आमलाड येथे विश्व आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा­


तळोदा तालुक्यातील आमलाड विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था संचलित माध्यमिक विद्यालय आमलाड व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिर आमलाड यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व आदिवासी गौरव दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

­
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमलाडचे उपसरपंच  किरण कोळी होते. प्रमुख वक्ते म्हणून पंचायत समिती तळोदा येथील ग्रामविस्तार अधिकारी मुकेश कापुरे उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते सतिवान पाडवी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. व्ही. मराठे, श्रीमती सुनीता शिंदे व मनिलाल खर्डे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती माता, कुलदैवत देवमोगरा माता, वीर क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा आणि वीर एकलव्य यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी प्रमुख वक्ते मुकेश कापुरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, रूढी, लोककला, निसर्गाशी असलेले अतूट नाते तसेच आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक योगदानाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. आदिवासी संस्कृती ही केवळ परंपरांचा वारसा नसून निसर्ग संवर्धन, पर्यावरण रक्षण, सहजीवन आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी जीवनपद्धती आहे, असे त्यांनी सांगितले.
आदिवासी समाजातील महान व्यक्तिमत्त्वांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि सामाजिक परिवर्तनात दिलेल्या योगदानाचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आपल्या समृद्ध परंपरांचे जतन करावे आणि पुढील पिढीपर्यंत हा वारसा पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याची तसेच निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीविषयी अभिमानाची भावना निर्माण होण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीही अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आदिवासी संस्कृती, परंपरा, लोककला आणि निसर्गाशी असलेले नाते यांचे दर्शन घडविणाऱ्या विविध सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक समितीचे ए. ए. शेंडे, आर. बी. कुवर, एस. ए. सूर्यवंशी, बी. बी. शेंडे, डी. एन. गिरासे, आर. के. पाडवी, वाय. एस. मासुळे, श्रीमती आशा जाधव, श्रीमती शीतल ठाकरे, शिक्षकेतर कर्मचारी लखन पाडवी तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विश्व आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचा गौरव, परंपरांचे जतन आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *