नंदुरबार

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात 1 ऑगस्ट रोजी सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा निर्णय

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात 1 ऑगस्ट रोजी सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टी

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा निर्णय

नंदुरबार, दि. 31 जुलै  : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या हवामान पूर्वसूचनेनुसार तसेच राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, मुंबई येथून प्राप्त संदेशाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 1 ऑगस्ट 2026 रोजीही पावसाची शक्यता असून त्यानंतर पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीजन्य परिस्थिती लक्षात घेऊन शनिवार, दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

← Back

Thank you for your response. ✨

भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यात शुक्रवार रात्रीपासून तसेच दिवसभर मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तसेच सर्व नगरपालिकां, नगरपरिषद व नगरपंचायतींकडून दूरध्वनीद्वारे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये शहरी व ग्रामीण भागातील सखल क्षेत्रांमध्ये पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे, वाहतुकीस अडथळे निर्माण होणे तसेच इतर आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. मित्ताली सेठी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला असून, त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना शनिवार, दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने संबंधित सर्व विभाग, शिक्षण संस्था व स्थानिक प्रशासनाने या आदेशाची तात्काळ आणि काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांनी हवामान विभाग व जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *