नंदुरबार जिल्ह्याच्या हक्कासाठी आ.राजेश पाडवींचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्वपूर्ण नर्मदा प्रकल्पातील १० टीएमसी पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार –शुभम चौधरी.

नंदुरबार | सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
नर्मदा प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हक्काचे १० टीएमसी पाणी राज्याला उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा उत्तर महाराष्ट्र, विशेषतः नंदुरबार जिल्ह्यासाठी ऐतिहासिक आणि विकासाला नवी दिशा देणारा असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे तळोदा तालुका महामंत्री शुभम संजीव चौधरी यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून नर्मदा नदीचे पाणी नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी प्रभावीपणे उपलब्ध व्हावे, अशी जनतेची अपेक्षा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेत गुजरात राज्य शासनाशी सकारात्मक समन्वय साधत महाराष्ट्राच्या हक्काचे १० टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हा निर्णय राज्याच्या जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने दूरदृष्टीचा असून नंदुरबार जिल्ह्याच्या भविष्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
नंदुरबार हा कृषीप्रधान आणि आदिवासीबहुल जिल्हा असून येथील बहुतांश शेतकरी शेतीसाठी पावसावर अवलंबून आहेत. अनियमित पाऊस, हवामान बदल आणि वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत नर्मदेचे पाणी उपलब्ध झाल्यास सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होईल, पिण्याच्या पाण्याच्या योजनांना बळ मिळेल, भूजल पातळी सुधारण्यास मदत होईल तसेच शेतकऱ्यांना दुबार व तिबार पिके घेण्यासाठी मोठा आधार मिळेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे.
शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाबाबत सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाची प्रभावी मांडणी करून हा विषय प्राधान्याने मार्गी लागावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. स्थानिक जनतेच्या भावना आणि अपेक्षा शासनापर्यंत पोहोचविण्यात त्यांचे योगदान निश्चितच मोलाचे आहे.
तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी या महत्त्वपूर्ण विषयात दिलेल्या सहकार्यामुळे हा निर्णय प्रत्यक्षात साकार होण्यास बळ मिळाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील तसेच शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्व, पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळणार असून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा हा निर्णय ठरेल, असा विश्वास व्यक्त करत नंदुरबार जिल्ह्यातील जनतेच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करीत असल्याचे शुभम संजीव चौधरी यांनी सांगितले.
- 0
- 0
- 0
- 0





