नंदुरबार महाराष्ट्र

पत्रकारितेत काळाची पावले ओळखून ‘नव्या प्रवाहांचा’ स्वीकार करा !माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे

पत्रकारितेत काळाची पावले ओळखून ‘नव्या प्रवाहांचा’ स्वीकार करा !
माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे

नंदुरबार, दिनांक 17 जून 2026 (जिमाका):
माध्यम क्षेत्राचे स्वरूप अत्यंत वेगाने बदलत असून, तंत्रज्ञानातील बदलांशी जुळवून घेणे ही आजच्या काळातील पत्रकारितेची अनिवार्य गरज आहे. पत्रकारितेत केवळ माहिती देणे आता पुरेसे नसून, नव्या डिजिटल प्रवाहांचा, पॉडकास्टचा आणि ‘सहभागाची पत्रकारिता’ (Participatory Journalism) या संकल्पनांचा प्रभावी वापर करून पत्रकारांनी आपली विश्वासार्हता वृद्धिंगत करावी, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नाशिक विभागीय उपसंचालक डॉ. किरण मोघे यांनी केले.

नंदुरबार जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांच्या ‘बहुमाध्यम केंद्र’ (Multimedia Center) आणि पत्रकार परिषद सभागृहात आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात डॉ. मोघे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, पत्रकार योगेंद्र दोरकर, सुर्यभान राजपूत, रमाकांत पाटील, हिरालाल चौधरी, मनोज शेलार, राकेश कलाल, जयदीश जायस्वाल, निलेश पवार, गौतम बैसाणे, राजाराम पाटील, अकील पिंजारी, गणेश वडनेरे, शैलेंद्र चौधरी, सुर्यकांत खैरनार, देवेंद्र माळी, प्रशांत जव्हेरी, वैभव करवंदकर, आफताब सनावर खान, सल्लाउद्दीन लोहार, सागर निकवडे, जगदीश ठाकूर, दिलीप बडगुजर हे उपस्थित होते.

यावेळी डॉ. मोघे यांनी पत्रकारितेसमोरील आव्हाने, संधी आणि प्रशासकीय सहकार्यावर सविस्तर संवाद साधला. डिजिटल क्रांती आणि विश्वासाचे नाते डॉ. मोघे यांनी अधोरेखित करताना सांगितले की, सोशल मीडियाच्या युगात माहितीचा प्रचंड ओघ असताना ‘विश्वसनीयता’ हेच पत्रकारांचे सर्वात मोठे भांडवल आहे. वाचक आणि प्रेक्षकांच्या आवडीनिवडी दर तीन ते सहा महिन्यांनी बदलत आहेत, हे ओळखून स्थानिक वृत्तपत्र किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म चालवताना संपादकीय मांडणीत नावीन्य आणणे काळाची गरज आहे. यूट्यूब चॅनेल किंवा वेब पोर्टल्सच्या माध्यमातून माहिती देताना तिची विश्वासार्हता टिकवून ठेवल्यास जनमानसात मोठा प्रतिमा निर्माण होते. याशिवाय, ‘पॉडकास्ट’ आणि लघू व्हिडिओंच्या (Short Videos) माध्यमातून माहिती अधिक लोकाभिमुख करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

‘विकास पत्रकारिता’ म्हणजे केवळ शासकीय योजनांची प्रसिद्धी किंवा कौतुक करणे नव्हे, तर त्या सोबत योजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रभावीपणे कशी होईल आणि लाभार्थ्यांच्या समस्या कशा सुटतील, हे शोधून त्यावर विधायक उपाय मांडणे होय, असे डॉ. मोघे यांनी स्पष्ट केले. नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये विकासाच्या अनेक कथा दडलेल्या आहेत, त्या पत्रकारांनी प्रभावीपणे समाजासमोर मांडाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रशासकीय सहकार्य आणि ई-ऑफिसचा वेग प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि ई-ऑफिस प्रणालीचा उल्लेख करत, माहिती कार्यालय नेहमीच पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक काळात किंवा अन्य तांत्रिक बाबतीत असलेले वैधानिक नियम वगळता, माहिती कार्यालय पत्रकारांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते, असेही त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाशी मैत्री आणि ध्येयनिष्ठ पत्रकारिता यांच्या संयोगातूनच भविष्यातील आव्हाने यशस्वीपणे पेलता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे डॉ. मोघे यांनी निरसन केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी आणि मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे दिनेश चौरे, लक्ष्मण पवार, विकास नाठे, चंद्रकांत अहिरे यांनी परिश्रम घेतले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *